काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यानुसार पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. काल सर्व शहरांचे फोटोज खूप बोलके होते. पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर सारखी शहरं जी नेहमी गर्दीने ओसंडून वाहत असतात, गजबगाजटलेली असतात, ती आज शांत होती. लोकांना पक्ष्यांचे आवाज अनेक वर्षांनी ऐकायला मिळाले. सगळ्यांनी आपापल्या घरी राहत या जनता कर्फ्यूचे पालन केले आणि पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद दिला. याच प्रमाणे सायंकाळी ५ वाजता प्रत्येक शहराच्या प्रत्येक घरातून टाळ्यांचा, शंखनाद, थाळीनाद, घंटानादाचे आवाज येत होते. पंतप्रधानांनी सांगितल्या प्रमाणे या कठिण काळात जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या प्रत्येकाला अशा पद्धतीने संपूर्ण देशाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यामध्ये सर्व सेलिब्रिटीजचा देखील समावेश होता.
संपूर्ण देशाने सायंकाळी ५ वाजता आपापल्या घराच्या बाल्कनी आणि खिडकीत येत टाळ, टाळी, थाळी, घंटा, शंख अशा सर्व प्रकारांनी एक प्रकारे या कठीण काळात जनतेची सेवा करत असलेल्या सगळ्यांनाच मानवंदना दिली. हा क्षण अतिशय ऐतिहासिक होता. अनेकांचे अश्रु थांबत नव्हते. कठीण काळात आपला देश एक परिवार म्हणून एकत्र मिळून या संकटाचा सामना करतोय अशी भावना या क्षणातून मिळाली. यामुळे भारताला नक्कीच या संकटावर मात करण्यासाठी हत्तीचे बळ मिळाले आहे.