केरळमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारने ही खबरदारीची पावले उचलली आहेत. कोरोना रुग्ण शोधण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.केरळमधून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठीच सरकारने कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. हवाई मार्गाने महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे.
तर याआधी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी देण्याआधी त्यांचे रिपोर्ट चेक करा, अशी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला विनंती केली होती. त्याचबरोबर रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांकडे ९६ तास आधीचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक केला होता.यापूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक केली होती.