आज भारत कोरोना सारख्या अतिशय मोठ्या संकटातून जात आहे. पंतप्रधानांपासून ते गोर गरीब जनतेपर्यंत, टाटा बिरला अंबानींपासून ते अगदी सामान्य जनतेपर्यंत सगळ्यांनाच या संकटाने घरात कोंडले आहे. असे असताना सिनेसृष्टीने एका सुरेल गीताच्या माध्यमातून देशवासियांना पाठींबा दिला आहे, आधार दिला आहे. आज मुस्कुराएगा इंडिया या गाण्याच्या माध्यमातून ‘आपण लवकरच या संकटातून बाहेर येऊ, पुन्हा एकदा देशात सगळं पूर्वपदावर येईल.’ अशी आशा या सिने कलाकारांनी देशवासियांच्या मनात जागवली आहे.
या गीताची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशापासून होते, यामध्ये ते म्हणतायेत कि, “मला विश्वास आहे आपण या संकटातून लवकरच बाहेर येऊ आणि या कठीण प्रसंगाला आपण हिंमतीने सामोरे जाऊ.” यानंतर गाण्याची सुरुवात होते. “फिरसे शहरों में रौनक वापस आएगी, फिरसे गावों में लौटेगी हँसी’ या गीताचे बोल आहेत. एकूणच कठीण परिस्थितीत हे गाणं एकल्यावर आणि हा व्हिडियो बघितल्यावर अतिशय सकारात्मक अशी भावना निर्माण होते.
या व्हिडियोत अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कृति सॅनोन, टायगर श्रॉफ, विकी कौशल, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, भूमी पेडणेकर, कियारा आडवाणी, शिखर धवन, आरजे मलिष्का, रकुल प्रीत, अनन्या पांडे, जॅकी भगनानी, तापसी पन्नू आदि कलाकारांनी आणि खेळाडूंनी एकत्र येऊन भारताला एकतेचा संदेश दिला आहे. ‘जो साथ दे सारा इंडिया, फिर मुस्कुराएगा इंडिया’ असे या गाण्यातून या कलाकारांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आज देशाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे असे आवाहन केले आहे.
व्हिडियोचा शेवट बघून आपल्या डोळ्यात नक्कीच पाणी येतं. या व्हिडियोच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा वापर पीएम केअर फंडासाठी करण्यात येणार आहे, ज्यामुळे कोरोनाचा पार्श्वभूमीवर देशवासियांना याची मदत होईल.