यूएनचे पर्यावरण प्रमुख इनगर अँडरसन यांच्या मते, निसर्ग कोरोना विषाणूच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या हवामानातील बदल या संकटाचा इशारा देत आहे आणि हा इशारा मानवाने गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. पुढे अँडरसन म्हणतात की मानवतेने हानिकारक परिणामांसह नैसर्गिक जगावर बरेच दबाव आणले आहेत. आपल्या ग्रहाची (पृथ्वीची) काळजी न घेणे म्हणजेच स्वतःची काळजी घेण्यास अयशस्वी ठरणे असे आहे. कोरोना विषाणू हा मानवाला स्पष्ट चिथावणी देत आहे आणि निसर्ग आपल्याला वारंवार समजविण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आपण अजून देखील सतर्क होत नाही.
आघाडीच्या शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की कोविड -19 हा उद्रेक असून मानवजात आज आगीशी खेळत आहे. मनुष्याच्या निष्काळजी वागणूकीमुळे हा रोग मनुष्यात पसरला आहे आणि यातून आता बाहेर येणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अमेरिकेतील न्युयार्क शहर हे स्वप्नांच शहर मानलं जातं मात्र सध्या या शहराची अवस्था प्रेतांचे शहर अशी झाली आहे. कोरोना विषाणूमुळे जेवढा धोका मानवाला आहे त्याहून मोठा धोका भविष्यातील अर्थव्यवस्थेला होणार आहे असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
या आधीही अनेक रोगांनी मानवी जीवन विस्कळित केले होते. प्लेग, इन्फ्ल्युएन्झा, कांजण्या, चिकनगुनिया, टायफाईड, डांग्या खोकला, डेंग्यू या साथीच्या रोगांची लागण 19 व्या शतकापासून सुरू झाली होती. मात्र या रोगांना मानवाने आटोक्यात आणले आणि आज हे रोग नामशेष झाले. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर वाढते प्रदुषण, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट, वातावरणातील वाढते मिथेनचे उत्सर्जन, ऑक्सिजनचा अभाव, कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे आपण पृथ्वीचे आयुष्य कमी केलेच आहे सोबतच मानवाची रोगप्रतीकारक शक्ती देखील कमी केली आहे.
प्रत्येक वर्षी, ग्लोबल वार्मिंगच्या परिणामाबद्दल वैज्ञानिक अधिक जाणून घेतात. या परिणामांचा अभ्यास करून वैज्ञानिक अनेक वेळा जगाला सतर्क करण्याचा प्रयत्न करित असतात. बरेच लोक वैज्ञानिकांच्या या निष्कर्षाला सहमत देखील आहेत. जर सध्याचा ट्रेंड कायम राहिला तर पर्यावरणीय घडामोडींचा विपरीत परिणाम आर्थिक आणि आरोग्यावर होणार हे विधिलिखीत आहे. याच सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला एक अंदाज असा बांधता येईल की, कोरोना विषाणू हा निसर्गाचा एक सतर्कतेचा इशारा असू शकतो काय?
आज जगभरात लॉकडाऊन हि संकल्पना सुरू आहे. लोकांना आता घरात कंटाळा येत असला तरी मात्र आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला असता हा काळ केवळ पर्यावरणाला देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज तारखेपर्यंतच्या वातावरणातील बदलाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, भारतातील अनेक मेट्रो शहरातील प्रदूषण कमी झाले आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, चेन्नई, हैद्राबाद, कलकत्ता, या मेट्रो शहरांची हवेची गुणवत्ता सुधारली असून प्रदूषण पातळी घसरली असल्याचे टिपण्यात आले आहे.
वायू प्रदूषणामध्ये घसरण नोंदविली होती. येथे कोरोना व्हायरसचा उद्रेक डिसेंबर 2019 मध्ये सुरू झाला त्यानुसार स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संशोधक मार्शल बुर्के यांनी चीनमध्ये नोंदलेल्या हवेच्या गुणवत्तेत झालेल्या सुधारणांची गणना केली तर 4,000 मुलांचे प्राण यातून वाचवले जावू शकते असा निष्कर्ष पुढे आला होता. ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी होत असल्याने हवेची गुणवत्ता लक्षणीय सुधारली आहे आणि यामुळे पृथ्वीचा ओझोन थरही पुन्हा सावरत आहे.
वरील काही चांगले परिणाम कोरोना विषाणूमुळे आज आपल्याला दिसत आहेत. आता या विषाणूच्या चांगल्या बाजूंचा अभ्यास केला असता केवळ पर्यावरणावर याचा सकारात्मक परिणाम होतांना आपल्याला दिसत आहे. मात्र याच कोरोना विषाणूचा जगावर होणारा नकारात्मक परिणाम आपण अभ्यासला तर या विषाणूमुळे मानव कित्येक वर्ष मागे जावू शकतो. त्यामुळे हा विषाणू लवकरात लवकर या जगातून नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.